पोलिसांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांना "चप्पल जोड्यांनी" मारले..?



    राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बेताल वक्तव्याचा संपूर्ण राज्यातील  शेतकऱ्यांकडून तीव्र निषेध करण्यात येत असून जागोजागी त्यांच्या चीड आणणाऱ्या "वक्तव्याचा धिक्कार" करण्यात येत आहे.ह्याच त्यांच्या वक्तव्यावरून आज रोजी जागोजागी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत.तर अकोला जिल्ह्यात बहिरखेड फाट्यावर त्यांना चक्क "चप्पलांनी मारण्याचे"  आंदोलन आयोजित करण्यात आले होते.


   महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांविषयी केलेल्या बेताल आणि अपमानकारक  वक्तव्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वक्तव्याचा निषेध करीत अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात बहिरखेड फाटा येथे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी एकत्र येत रविवार ६/४/२०२५ ला सकाळी १० वाजता शेतकरी एल्गार समिती, बार्शी टाकळी तालुक्याच्या वतीने कृषिमंत्र्यांना "चपला मारण्याचे" आंदोलन करण्यात आले.


    या आंदोलनात परिसरातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी कृषिमंत्री कोकाटे यांचा निषेध करीत त्यांच्या वक्तव्याचे प्रातिनिधिक प्रतीक म्हणून त्यांच्या फोटोंला शेतकऱ्यांनी "चप्पल व जोड्यांनी"  मारून मनात असलेला रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांनी हातात निषेध फलक घेऊन,"कोकाटे हाय हाय", "शेतकऱ्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही", "कर्जमाफी हक्काची,भीक नव्हे!" अशी  जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी केली.


    या आंदोलनादरम्यान एल्गार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सांगितले की, “कृषिमंत्री कोकाटे यांच्या डोक्यावर न्यायालयाच्या त्यांच्या विरुद्ध झालेल्या निर्णयाने परिणाम झाला असावा. त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर ज्या बेजबाबदार पद्धतीने वक्तव्य केले, ते मानसिक असंतुलनाचे निदर्शक आहे. त्यामुळे बार्शी टाकळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, अशी आमची कळकळीची विनंती आहे.”

   यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्यामध्ये किरण ठाकरे, महादेवराव गावंडे, अविनाश ठाकरे, प्रल्हाद माळकर, गणेश ताठे, दिलीप घुमसे, मनोहर कमानदार, जनार्दन ठोकळ, सुरेश वानखडे, स्वप्निल ठाकरे, अनंता घुमसे, मंगेश सोनटक्के, देविदास ठाकरे, पांडुरंग घुमसे, सोपान ठाकरे, रवी ठाकरे, बाबूसिंग चव्हाण, सोनू जाधव, समाधान इंगळे, बाळूभाऊ राऊत, गजानन गाढवे, कैलास इंगळे, अनिल इंगोले, सागर ठाकरे, सुभाष पाटील, मंगेश प्रधान, दादू बडवे, महेश ठाकरे, दत्ता घुमसे आदींसह तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी इशारा दिला की, जर शासनाने कोकाटे यांच्यावर कारवाई केली नाही, तर आगामी काळात हे आंदोलन जिल्हा व राज्य स्तरावर उग्र रूप धारण करेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी,अन्यथा पुढील आंदोलनांची जबाबदारी सरकारवर असेल.

    या आंदोलना दरम्यान स्थानिक पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बार्शी टाकळी पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली फार मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तरीही सर्व आंदोलन शांततेत व संयमाने पार पडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या