तेल्हारा तालुक्यातील हिंगणी खु.या गावात दोन भावांनी अत्यंत निर्दयपणे खून करून लहानशा बहिण भावाचे पितृछत्र हिरावून घेणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज अकोटच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
दि.०१.०२.२०२५ रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दाखल अप. क्र.४२३/ २०२४ चे कलम १०३(१),३(५) भान्यासं.मधील आरोपी क्र.१) योगेश श्रीराम सोळंके,वय ३७ वर्ष,आरोपी क्र.२) नागेश श्रीराम सोळंके वय ३२ वर्ष दोघेही राहणार हिंगणी बु.ता. तेल्हारा, जि.अकोला यांनी दिवसा ढवळया हिंगणी बु. येथील ३५ वर्षीय डिगांबर कोरडे याच्या गुप्तांगावर, पायावर लाथा मारून इतर आरोपी च्या मदतीने व संगणमताने खून केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज आज दि. ०१.०२. २०२५ रोजी नामंजूर केला आहे.या प्रकरणात हे दोन्ही आरोपी अकोला कारागृहात दि.२८.११.२०२४ पासून बंदीस्त आहेत.
या प्रकरणात सरकार तर्फ सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात लेखी युक्तीवाद सादर केला की,३० वर्षीय फिर्यादी असलेल्या मृत्काच्या पत्नीने हिवरखेड पो.स्टे.ला दि.२८.११. २०२४ रोजी या प्रकरणात फिर्याद दिली की,फिर्यादी ही हिंगणी बु.येथे एक ७ वर्षीय लहान मुलगा पती डिगांबर व एक लहान मुलगी यांच्यासह राहते व मजुरीचे काम करते. दि.२७.११.२०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा. चे सुमारास फिर्यादीचा ७ वर्षीय अल्पवयीन मुलगा घरी धावतपळत आला व त्याने फिर्यादी आईला सांगितले की, बाबाला छात्यावर बसून काही लोकं मारत आहेत. त्यामुळे फिर्यादी धावतच गावातील गजानन जवंजाळ यांच्या घरासमोर गेली असता, फिर्यादीचे पती डिगांबर कोरडे हे खाली जमीनीवर पडलेले होते. त्यांच्या छातीवर बसून,श्रीराम सोळंके हे बुक्यांनी मारहाण करित होते व केस धरून खाली जमीनीवर आपटत होते. तसेच आरोपी योगेश सोळंके व नागेश सोळंके हे डिगांबरच्या गुप्तांगावर, पायात व पोटात लाथा मारीत होते. फिर्यादी व तिचा मुलगा घटनास्थळावर गेल्यावर तेथून श्रीराम सोळंके व त्याचे दोन्ही मुले निघून गेले. त्यानंतर फिर्यादीने तिच्या जखमी पतीला ऑटोने सरकारी दवाखान्यात नेले.तेव्हा डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. अशा फिर्यादीवरून वरील प्रमाणे तिन्ही आरोपींविरूध्द हिवरखेड पो.स्टे. येथे वरील प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करून तपास अधिकारी ठाणेदार गजानन राठोड यांनी प्रकरण तपासात घेतले.
या प्रकरणामध्ये सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपींनी केलेल्या मारहाणीत मृतकाच्या अंगावर एकूण ९ जखमांचा उल्लेख शवविच्छेदन अहवालामध्ये आहे. तसेच या प्रकरणात या खूनाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ३० वर्षीय महिला जी मृतकची पत्नी आहे व तिचा एक अल्पवयीन मुलगा जो ७ वर्षाचा आहे, त्याने देखील त्याच्या वडीलांचा खून होतांना पाहिले आहे. यासर्व आरोपींनी खूनासारखा गंभीर गुन्हा केलेला आहे. या प्रकरणातील आरोपी व फिर्यादी,पंच व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे एकाच गावात राहणारे असून,या आरोपींना जामीन मंजूर झाल्यास दोन्ही पक्षात पुन्हा वाद निर्माण होवून याच गुन्हयासारखा गंभीर गुन्हा घडून,या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.तसेच फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांना हस्ते परहस्ते धमकावू शकतो. या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नसून, सबळ पुरावे गोळा करणे सुरू आहे. त्यामुळे निष्पन्न झालेल्या साक्षीदारांवर आरोपी लोक दबाव आणू शकतात व त्यांना फितूर करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वरील दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर कोर्टाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला.



0 टिप्पण्या