आपण शून्यातून लढा देऊन विश्व निर्माण करणारे लोकं आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा हा मंत्री पदाचा नाही तर हा लढा अस्मितेचा आहे,असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कितीही गळा काढून सांगत असले तरी त्यांचे सर्व प्रयत्न आणि जे काही सुरू आहे ते केवळ आणि केवळ मंत्री पदासाठीच. हे त्यांच्या गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या हालचालींवरून अगदी स्पष्टपणे जाणवत आहे.
गेल्याच आठवड्यात माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे,विश्वासबापू आहेर, डी. के. जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत येवल्यात आयोजित सभेत छगन भुजबळ म्हणाले की, आपण अनेक मंत्री पदावर काम केलं आहे. गेली ४० वर्षांहून अधिक काळापासून आपण काम करतो आहोत. त्यामुळे हा प्रश्न मंत्री पदाचा नाही. आपला हा लढा अस्मितेचा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंघ राहून काम करावे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आपण घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, येवला लासलगाव विधानसभा मतदार संघातील सर्व जनतेने विशेष मेहनत घेऊन मला पाचव्यांदा संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्द आपण येवलेकरांना दिला आहे. तो पुढील काळात आपल्याला पूर्ण करायचा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून विकासाची कामे
आपल्याला पूर्ण करायची आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून विकासाची कामे अविरतपणे सुरू राहतील. येवला लासलगाव मतदारसंघ आपल्याला एकसंघ ठेवायचा आहे. आगामी काळात येवला मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी यावेळी ओबीसींच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. तसेच भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, ओबीसीची एकच चळवळ, छगन भुजबळ छगन भुजबळ अशा विविध घोषणांनी कार्यालय परिसर दणाणून सोडला. तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात घ्या, अशी मागणी उपस्थितांनी केली.यावरून छगन भुजबळ यांचा लढा हा केवळ मंत्री पदासाठीच आहे.हे त्यांच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या